Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Chopda News : मुसळधार वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची कोट्यवधींची हानी, नुकसान भरपाईची मागणी



जळगाव न्यूज :- चोपडा तालुक्यातील अनेर काठ परिसरात दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची अक्षरशः धांदल उडवून दिली. या पावसामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक शेती पिके आडवी पडली आहेत. परिसरात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

विशेषतः अनेर काठातील वेळोदे, खेडी, डोंगरकाठी भागांतील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. वेळोदे येथील जगदीश बोरसे यांचे शेडनेट पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा उन्मळून पडल्या असून, ऊस, मका, भाजीपाला यांसारख्या पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे.

पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे झाडांची मुळे उपटली गेली आहेत. केळीच्या झाडांचे वजन अधिक असल्याने वाऱ्याच्या तडाख्याने ती झाडे जमिनीवर कोसळली आहेत. काही भागांत विजेचा खांब आणि वीजपुरवठाही खंडित झाला असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेर काठ संघर्ष आणि निर्माण समितीचे संयोजक प्रा. प्रदीप लिंबा पाटील यांनी शासनाकडे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे. "पावसाळा सुरू होण्याआधीच झालेला हा पाऊस शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा," असे त्यांनी सांगितले.



तालुक्यात यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड करण्यात आली होती. मात्र, निसर्गाच्या कोपामुळे याचा सर्वात मोठा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांनाच बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याची हतबलता त्यांच्यात दिसून येते.

प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत किंवा पाहणी सुरू झाली नसून, शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी कृषी अधिकारी व महसूल प्रशासनाला तातडीने भेटी देण्यास सुरुवात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या