जळगाव न्यूज :- अमळनेर तालुक्यातील पातोंडा गावात २९ मे रोजी रात्री झालेल्या भीषण मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कैलास शामसिंग प्रजापती (वय अंदाजे ४०) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. कैलास हा मध्य प्रदेशातील रहिवासी असून तो सध्या आपल्या भावासोबत ठेकेदारीच्या कामासाठी पातोंडा येथे मुक्कामाला होता.
ही घटना २९ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास विका सोसायटीच्या गोदामात घडली. कैलास तेथे झोपलेला असताना चौघा जणांनी त्याला उठवून जबरदस्तीने ४० हजार रुपयांची मागणी केली. त्याने सकाळी पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही आरोपींनी लोखंडी पाइप व लोखंडी पहारने त्याच्या नाकातोंडावर आणि पायावर वार करत जबरदस्त मारहाण केली.
या मारहाणीनंतर कैलास बेशुद्ध अवस्थेत पडून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावरील सुपरवायझर तिवारी याने त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर तातडीने धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला इंदोर येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कैलासचा भाऊ राजेश शामसिंग प्रजापती विद्युत ठेकेदार असून सध्या पातोंडा परिसरात त्यांचे काम सुरू आहे. कैलास त्यांच्या कामासाठी सहाय्यक म्हणून होता.
या प्रकरणात पोलिसांनी चौघा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची नावे सलीम उर्फ संदीप धुर्वे, गोपाळ धुर्वे, साहुलाल धुर्वे, पंकज सेलू उमरावसिंग आणि शिवम फुलसिंग अशी आहेत. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली तपासाची सूत्रे हाती घेतली असून, मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
घटनेमागील कारण स्पष्ट नसले तरी प्राथमिक माहितीनुसार आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून आरोपींचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
ही घटना ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर मानली जात असून स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांकडे आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मृत कैलास प्रजापतीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
0 टिप्पण्या