मुंबई | प्रतिनिधी
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत, "उद्धव ठाकरेंसोबत आता कोणीही राहायला तयार नाही," असा दावा केला. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरे करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
गिरीश महाजन म्हणाले, "पूर्वी 'ज्यांना जायचे त्यांनी जावे, आम्हाला कुणाची गरज नाही' अशी भूमिका घेतली गेली. मात्र आता भूमिका बदलल्याचे दिसत आहे. मला वाटते आता ते शक्य नाही. पक्ष मोठ्या प्रमाणात फुटला असून त्यांच्यासोबत राहण्यास कोणीही तयार नाही."
ते पुढे म्हणाले, "आज अनेक शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वासोबत गेले आहेत. त्यामुळे केवळ सभागृहात घोषणा देऊन किंवा घरात बसून पक्ष वाढत नाही."
आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलताना महाजन म्हणाले, "मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी घराबाहेर पडून केवळ आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला पाहिजे. जनतेमध्ये गेल्याशिवाय पक्षाची वाढ होणार नाही."
महाजन यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या