चाळीसगाव | प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध चाळीसगाव गुरांचा बाजार यंदा पावसाअभावी ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी अद्याप पेरणीच्या प्रतीक्षेत असून, त्याचा थेट परिणाम गुरांच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शनिवारच्या गुरांच्या बाजारात नेहमीप्रमाणे होणारी मोठी गर्दी यंदा दिसून आली नाही. शेतकऱ्यांनी नवीन जनावरे खरेदी करण्यास टाळाटाळ केल्याने बाजारातील उलाढाल मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे.
गुरांच्या बाजारासोबतच शेतीसाठी लागणारी अवजारे, कृषी साहित्य तसेच इतर किरकोळ व्यावसायिकांच्या विक्रीवरही परिणाम झाला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यास तयार नसल्याने बाजारातील व्यवहार मंदावले आहेत.
दर बुधवारी आणि शनिवारी चाळीसगाव बाजार समितीत लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्या, लिंबू तसेच विविध मसाल्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असते. मात्र, यंदा ग्राहकांची संख्या कमी झाल्याने या बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, समाधानकारक पाऊस पडल्यानंतरच बाजारातील व्यवहार पुन्हा वेग घेतील. तोपर्यंत शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती सर्वच घटक प्रतीक्षेत आहेत.

0 टिप्पण्या