धरणगाव न्यूज : “ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि कर्म व भक्ती कधीही सोडू नका,” असा मौल्यवान संदेश देत प्रख्यात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी पाळधी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात मार्गदर्शन करताना समाजातील अनेक ज्वलंत मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य केले. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढणाऱ्या मोबाइलच्या वापरावर चिंता व्यक्त करत शाळांमध्ये मोबाइल पूर्णपणे बंदी घालण्याची आवश्यकता व्यक्त केली.
साप्ताहिक हरिनाम सप्ताह पाळधी गावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होत आहे. कीर्तनाच्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी समाज प्रबोधनाचे कार्य मोठ्या उत्साहात केले. कीर्तनाच्या प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते इंदुरीकर महाराजांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन महाराज (वरसाडेकर), शिवसेना युवासेना व जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराजांनी कीर्तनात सांगितले की, “हनुमान हे गावाचे ग्रामदैवत आहे, म्हणून श्रद्धा आणि भक्ती यांचा वारसा जपला गेला पाहिजे. आजच्या पिढीत अहंकाराचे विष पसरले असून मोबाइल व्यसनाने ४० टक्के विद्यार्थी भरकटले आहेत. त्यांना शिक्षण आणि सुसंस्कार देण्यासाठी शाळांमध्ये मोबाइलवर बंदी घालणे गरजेचे आहे.”
त्यांनी विद्यार्थ्यांना मोर्चा, आंदोलनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. “हसत-खेळत साधेपणाने जीवन जगावे, हेच खरं सुख आहे. वाईट विचार आणि आचरणाने समाजाचा नैतिक ऱ्हास होतो,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही प्रशंसा केली. “ते मंत्री असूनही सामान्य वारकऱ्यांप्रमाणे खाली बसून कीर्तन ऐकतात, हीच त्यांची खरी उंची आहे. जनतेचे प्रेम व प्रामाणिक कर्म हेच त्यांचे वैभव आहे,” असे त्यांनी सांगितले.
या सप्ताहात धर्मशीलता, ग्रामीण संस्कृती, सदाचार, भक्ती आणि एकात्मतेचे दर्शन घडले. एकूणच हा सप्ताह गावगाड्याच्या आध्यात्मिक उन्नतीचे प्रतिक ठरत आहे. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विक्रम पाटील, शिवसेना युवा सेना परिवार व जीपीएस मित्र परिवार यांनी केले असून, त्यांचे समाजहिताचे योगदान सर्वत्र कौतुकास्पद ठरले आहे.
धार्मिक जागृतीसोबतच सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराजांचे हे कीर्तन गावकरी, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक विचारप्रवर्तक ठरले.
0 टिप्पण्या