जळगाव – "राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. बेरजेचं राजकारण करत, सर्व घटकांना विश्वासात घेऊन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष बनवूया," असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. केसी कॉलेजच्या सभागृहात झालेल्या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. या वेळी मंचावरून अजितदादांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "आम्ही कधीच जात-पात, धर्म मानला नाही. अठरापगड जातींना बरोबर घेऊन शिवरायांनी राज्य केलं, त्याच पद्धतीनं आम्हीही काम करतोय. सत्तेसाठी कधीच हपापलो नाही. आजपर्यंत सर्वाधिक सत्ता भोगली, पण कार्यकर्त्यांना चुकीचं सांगून गोंधळ घालणं आमचं संस्कारात नाही."
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत अजित पवारांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत, "राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकमताने सरकारमध्ये सहभागी झाले. हे सर्व आमदार साक्षीदार आहेत," असंही ठामपणे सांगितलं.
तसंच, तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भाष्य करत ते म्हणाले, "कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI वापरण्याशिवाय पर्याय नाही. सर्वच क्षेत्रात याचा वापर वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. AI मुळे रोजगाराची नवीन दारे उघडतील. सरकारच्या माध्यमातून महापुरुषांची प्रेरणादायी स्मारके उभारली जात आहेत. महाराष्ट्राचा सर्वांगिण विकासच आमचं ध्येय आहे."
या कार्यक्रमात माजी मंत्री सतिश पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, दिलीपराव सोनवणे, प्रा. शरद पाटील, नेत्या तिलोत्तमा पाटील यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. तसेच जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पंचायत समिती, बाजार समित्यांतील विविध पदाधिकारीही राष्ट्रवादीत सामील झाले.
0 टिप्पण्या