Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

YAWAL ST BUS NEWS यावल एसटी आगारातील चालक-वाहकांच्या मनमानीने प्रवाशी त्रस्त




गोकुळ कोळी प्रतिनिधी यावल : राज्य परिवहन महामंडळाने “हात दाखवा गाडी थांबवा” हे घोषवाक्य जाहीर करत प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शाळकरी विद्यार्थिनींसाठी आहिल्याबाई होळकर योजना, महिलांसाठी विविध सवलती अशा अनेक योजनांच्या माध्यमातून एसटी महामंडळ नफ्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना यावल आगारातील काही चालक-वाहकांच्या मनमानी कारभारामुळे या उपक्रमांची प्रतिमा मलीन होत आहे.

यावल आगाराची बस (क्रमांक एमएच २० बी.एल. १४२५) किनगावहून यावलकडे जात असताना साकळी गावाजवळ एका केळीच्या वेफर्स दुकानाजवळ थांबली. त्या ठिकाणी काही प्रवासी एसटी बस थांबलेली पाहून तिच्या दिशेने धावले आणि गेट उघडून बसमध्ये चढले. मात्र, वाहकाने या प्रवाशांना बसमधून उतरवून “तुम्ही साकळी स्टॉपजवळ या, तेथूनच बसा” असे सांगितले. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.


एक तक्रारदार प्रवासी म्हणाले, “गाडी स्टॉपशिवाय थांबली, आम्ही बसमध्ये चढलो, परंतु वाहकाने अरेरावी करत आम्हाला थांब्यावरूनच बसायला सांगितले. मी नियमानुसार दुसऱ्या थांब्याचे तिकीट मागितले तरीही गेट उघडण्यात आले नाही. यामुळे आम्हाला पायपीट करावी लागली.”

या घटनेने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित चालक व वाहकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. प्रवाशांचे म्हणणे आहे की, “केळीचे वेफर्स घेण्यासाठी गाडी थांबू शकते, पण प्रवाशांनी हात दाखवून बस थांबवली तरी गाडी थांबत नाही. अशा वागणुकीमुळे एसटी महामंडळाने सुरू केलेल्या उपक्रमाचा काही उपयोग नाही.”

प्रवाशांनी जोरदार मागणी केली आहे की, या मनमानी करणाऱ्या चालक-वाहकावर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांनी असेही म्हटले की, महामंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून वैयक्तिक गरजांसाठी थांबणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होतो आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.

या संदर्भात यावल आगार प्रमुख दिलीप महाजन यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. संबंधित चालक-वाहकांविरुद्ध योग्य ती चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल.”

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा सुरू केल्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात राबवण्याचे काम हे चालक-वाहकांवर अवलंबून असते. तेच जर आपली जबाबदारी न पाळता मनमानी वर्तन करत असतील, तर प्रवाशांच्या विश्वासाला तडा जातो. त्यामुळे एसटी प्रशासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून संबंधितांवर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.


👉 WhatsApp चॅनेल जॉइन करा - https://whatsapp.com/channel/0029Vb68EiMJJhzR7qNXEn0F





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या