नाशिक - शिवसेना (ठाकरे गट) मध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे का? असा प्रश्न आता नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय. याला कारण ठरले आहे पक्षाचे उपनेते आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुधाकर बडगुजर यांचे वक्तव्य. त्यांनी पक्षात ८ ते १० पदाधिकारी नाराज असल्याचा गौप्यस्फोट करत ठाकरे गटात वादळ निर्माण केले आहे.
बडगुजरांचे वादग्रस्त वक्तव्य
सुधाकर बडगुजर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गटात अस्वस्थता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलांमुळे अनेकांना विश्वासात घेतले गेले नाही, त्यामुळे नाराजी असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे बडगुजर यांनी "मी स्वतःवर नाराज आहे" असेही स्पष्टपणे सांगितले.
बडगुजर यांच्या म्हणण्यानुसार, महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह अनेकजण नाराज आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी नाशिकमध्ये झालेल्या पक्षघटनेचा थेट उल्लेख करत थेट नेतृत्वावर बोट ठेवले.
देवेंद्र फडणवीस यांची भेट: राजकीय चर्चा तेज
या सर्व पार्श्वभूमीवर बडगुजर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट मनपाच्या कामगार प्रश्नांसंदर्भात असल्याचा दावा त्यांनी केला असला तरी, त्यानंतर त्यांनी नाराजांची यादी जाहीर करताच राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले.
शिंदे गटाचे वाढते संपर्क
यात आणखी तेल ओतण्याचे काम केले ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. त्यांनी विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली, त्यामुळे पक्षांतर्गत चर्चा जोरात आहेत की ठाकरे गटातील काही नेते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत का?
विलास शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून, "घरी विवाहकार्य असल्यामुळे मी राजकीय घडामोडींपासून दूर आहे," असे सांगितले.
बडगुजर यांचे आरोप फेटाळले
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांनी बडगुजर यांचे दावे फेटाळून लावले. त्यांनी स्पष्ट केले की, "सुधाकर बडगुजर यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना जिल्हाप्रमुख पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यानंतरच डी. जी. सूर्यवंशी यांना जिल्हाप्रमुखपद देण्यात आले."
भाजपकडून सूचक इशारा
या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांनी केलेले वक्तव्यही चर्चेचा विषय ठरत आहे. "उबाठा (ठाकरे गट) मध्ये कोणी राहणार नाही," असे थेट इशारेवजा विधान त्यांनी केल्याने राजकीय खळबळ अजूनच वाढली आहे.
आगामी निवडणुकीत परिणाम?
सुधाकर बडगुजर यांच्या या वक्तव्यानंतर नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात अंर्तकलह उफाळून आल्याचे स्पष्ट होते. स्थानिक नेते आणि माजी नगरसेवक भाजप व शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे संकेत मिळत असून, यामुळे पक्ष नेतृत्वासाठी ही एक नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक युनिटमध्ये सध्या मोठी घुसमट आहे. बडगुजर यांचे वक्तव्य हे केवळ नाराजीच नाही तर संभाव्य फूटीकडे इशारा करणारे आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात नाशिकमध्ये ठाकरे गटात कोणते बदल होतात, कोण पक्ष सोडतो आणि कोण सोबत राहतो, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या