शहरात १ ते ५ मे दरम्यान तापमान ४३ अंशांपर्यंत गेले होते, त्यानंतर तापमानात सातत्याने घसरण झाली आहे. ६ मे पासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून २७ मेपासून तापमान सलग चौथ्या दिवशी ३५ अंशांच्या आत आहे. मात्र, विभागात अजूनही पावसाचा चांगला जोर लागलेला नाही, त्यामुळे कृषी विभागाने पेरणीची घाई करू नये, असा सल्ला दिला आहे.
भुसावळमध्ये मे महिन्याला सहसा उष्ण तापमान असते, पण यंदा अवकाळी पावसामुळे हा महिना तुलनेने थंडसर राहिला आहे. मे महिन्यात ६ मे रोजी १.८, ७ मे रोजी १९.८, १३ मे रोजी ०.४, २३ मे रोजी १.८ आणि २८ मे रोजी ९.४ मिली पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यात एकूण ५ दिवस पावसाचा नोंद झाला आहे.
सध्या जमीन उष्ण आहे आणि तापमान ३५ अंशांच्या आत असल्याने उकाडा वाढला आहे. मात्र, यंदा मान्सून अंदाजापेक्षा ८-१० दिवस लवकर सक्रिय होणार आहे. त्यामुळे भुसावळ विभागातही तो लवकर येणार आहे. मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्यानंतर वातावरणात गारवा जाणवेल आणि उकाडा कमी होईल.
खान्देशातही लवकरच मान्सूनची झेप लागणार आहे. दोन दिवसांपूर्वी पूणे आणि मुंबईत पोहोचलेला मान्सून आता मराठवाडा, विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोलीच्या दक्षिण भागांपर्यंत पसरला आहे. त्यामुळे खान्देशात मान्सून लवकरच येईल, असे सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या