Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Gulabrao Patil vs Gulabrao Deokar सत्तेशिवाय कधी राहूच न शकणाऱ्यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला : पालकमंत्री



चोपडा : "सत्तेशिवाय कधीच राहू न शकणाऱ्यांनी विधानसभेच्या निकालानंतर लगेचच सत्ता गाठण्याचा मार्ग स्वीकारला आणि थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा जळगाव ग्रामीणशी काहीही संबंध नाही, तरी येथे वाटा मागत आहेत," अशी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. त्यांनी कोणाचेही नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या माजी आमदार गुलाबराव देवकर यांच्यावर निशाणा साधला.

पाळधी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेच्या निमित्ताने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. व्यासपीठावर आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महिला जिल्हाप्रमुख सरिता कोल्हे माळी, माजी उपाध्यक्ष नंदू महाजन, सुभाष पाटील, संजय महाजन, शिवराज पाटील आदी उपस्थित होते.

गुलाबराव पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यामुळे विधानसभेपूर्वी विरोधी गटाचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्यावरही शिवसेना व भाजप पदाधिकारी खंबीरपणे उभे राहिले. कोणीही घाबरले नाही. त्यामुळेच लोकांनी पाचव्यांदा मला निवडून दिलं. हे यश म्हणजे केवळ जनतेच्या कामांवर विश्वास ठेवल्याचं फळ आहे.

ते पुढे म्हणाले की, एरंडोलपासून सत्रासेन पर्यंत ३०० कोटी रुपयांचे रस्ते कामे सुरू आहेत. तापी नदीवर भोकर ते खेडीभोकरी गावांवर १५० कोटींचा पूल उभारण्यात येत आहे. जळगाव ग्रामीणमध्ये कोट्यवधी रुपयांचे विकासकामे करण्यात आली आहेत. हे सगळं कार्यकर्त्यांच्या बळावर शक्य झालं आहे.

सभेच्या शेवटी, उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं नेतृत्व अधिक बळकट होवो, अशी भावना व्यक्त केली.

👥 जळगाव न्यूज WhatsApp 📲 ग्रुपमध्ये सामील व्हा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या