Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Dahigaon News : अवकाळी पावसाने लग्नसोहळ्यांमध्ये गोंधळ, शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान



दहिगाव तालुका यावल : शुक्रवारी दुपारी दहिगाव परिसरात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि त्याचा फटका थेट लग्नसमारंभ व शेतकऱ्यांना बसला. ऐन समारंभाच्या वेळेस झालेल्या पावसामुळे मंडप भिजले, वऱ्हाडींची धावपळ झाली तर दुसरीकडे शेतात व अंगणात सुकत घातलेला शेतीमाल पूर्णपणे भिजला.

दुपारी अडीचच्या सुमारास दहिगाव आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे लग्नसोहळ्यांमध्ये अराजक माजले. वऱ्हाडी, वधू-वराचे कुटुंबीय, आणि यजमान सर्वांना मंडपातून सामान उचलत सुरक्षित ठिकाणी जावे लागले. अनेक ठिकाणी जेवणावळीत पाण्याचे घोटाळे झाले. काही मंडप उघडे असल्याने पावसाचे पाणी थेट पंगतींमध्ये गेले.

सकाळपासून वातावरण ढगाळ होते आणि ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. अशातच दुपारी जेवणाच्या वेळेस पावसाने हजेरी लावली. दहिगाव परिसरात त्या दिवशी दहा ते बारा लग्नसोहळे पार पडत होते.

शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला. काहींनी भुईमूगाची खांडणी सुरू केली होती, काहींनी मका, ज्वारी, बाजरी किंवा इतर धान्य सुकत घातले होते. पावसामुळे सर्व शेतमाल भिजला. कोरड्या चाऱ्यालाही पाणी लागल्याने पशुखाद्याची हानी झाली.

मोहराळा, कोरपावली, हरिपुरा, सावखेडासिम आणि दहिगाव या भागात पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे या गावांमध्ये नुकसान अधिक झाले आहे.

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यांत अशा प्रकारच्या पावसामुळे शेती, लग्नकार्य व सामान्य जनजीवन विस्कळीत होते. मात्र अद्यापही स्थानिक प्रशासन किंवा हवामान विभागाकडून याविषयी कोणतीही पूर्वसूचना मिळालेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या