जळगाव न्यूज : राज्याच्या विविध आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर १५ मेपासून आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेला औपचारिक सुरुवात झाली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून, विद्यार्थ्यांना कोणत्याही केंद्रावर न जाता घरी बसून अर्ज करता येणार आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत ही प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर सर्व माहिती व अर्ज उपलब्ध आहे. यंदा ४९९ शासकीय आयटीआयमध्ये ९३,००० व ५८८ अशासकीय आयटीआयमध्ये ६१,००० जागा, अशा एकूण १,५४,००० जागांवर प्रवेश दिला जाणार आहे.
एक वर्ष व दोन वर्ष कालावधीच्या एकूण ८० अभ्यासक्रमांवर ही प्रवेशप्रक्रिया आहे. २६ मेपासून विद्यार्थ्यांना पसंतीच्या व्यवसाय व संस्था निवडण्यासाठी ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने एकच अर्ज भरावा लागणार असून, एकच मोबाईल क्रमांक वापरणे अनिवार्य आहे. याच क्रमांकावर ओटीपी व प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती पाठवली जाणार आहे.
अर्ज फी देखील स्पष्ट करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्गासाठी १०० रुपये, ओपन प्रवर्गासाठी १५० रुपये, महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये व अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये इतके शुल्क निश्चित केले आहे.
फेऱ्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या