राज्य प्रशासनाशी समन्वय; अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न सुरू
नवी दिल्ली, २३ एप्रिल – जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सहा महाराष्ट्रीयन पर्यटकांच्या पार्थिवांचे दिल्लीमार्गे मुंबई आणि पुण्याकडे सुरक्षितपणे रवाना करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सदन सतर्क असून, राजशिष्टाचार विभागातील अधिकारी मृतांच्या नातेवाईकांशी सतत संपर्कात आहेत.
जम्मू-कश्मीर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार पार्थिव मुंबईला, तर दोन पार्थिव पुण्याला पाठवण्यात येणार आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या चार पर्यटकांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्याशी देखील संपर्क साधण्यात आलेला आहे.
दरम्यान, राज्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इतर महाराष्ट्रीयन पर्यटकांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत ३०८ पर्यटकांशी संपर्क साधण्यात यश आले असून, स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांच्या निवास व पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देत, सर्वतोपरी मदत आणि समन्वय साधण्याची ग्वाही दिली आहे.
0 टिप्पण्या