भडगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे शेती विकण्याच्या वादातून पतीने पत्नीची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव ललिताबाई आत्माराम राठोड असे असून, या प्रकरणी तिचे पती आत्माराम पतीलाल राठोड यांच्याविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम राठोड यांना कोंबडीपालनाचा (पोल्ट्री) व्यवसाय सुरू करण्यासाठी फार्म उभारायचा होता. मात्र, त्यांच्याकडे आवश्यक भांडवल नसल्याने शेती विकण्याचा प्रस्ताव त्यांनी पत्नीसमोर मांडला होता. ललिताबाई यांनी शेती विकण्यास ठाम विरोध केल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाला.
या वादातून संतप्त झालेल्या आत्माराम राठोड यांनी पत्नीवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या ललिताबाई यांना उपचारासाठी विविध रुग्णालयांत नेण्यात आले. मात्र, भडगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर मृत महिलेचे भाऊ प्रकाश चव्हाण यांनी भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
या घटनेमुळे वसंतवाडीसह संपूर्ण भडगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या