Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Bhusawal Guest House News : विश्रामगृहात दिवसाही दिवे-पंखे सुरू, वीजेचा मोठा अपव्यय




भुसावळ न्यूज  : शहरात एकीकडे अनेक भागांमध्ये पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना अंधारात वाट काढावी लागत आहे, तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांमध्ये विजेची उधळपट्टी बिनधास्त सुरू आहे. विशेषतः भुसावळ येथील नव्याने उभारलेल्या शासकीय विश्रामगृहामध्ये दिवसा देखील दिवे आणि पंखे सतत सुरू ठेवले जातात.

सदर इमारतीमध्ये केवळ १ ते २ खोल्यांमध्येच सध्या वापर केला जात असताना संपूर्ण इमारतीत दिवे आणि पंखे चालू ठेवण्याचा प्रकार दररोज दिसून येतो. या विश्रामगृहात कोणी थांबलेले नसतानाही दिवसभर विजेचा वापर होत आहे. हे दृश्य अनेक वेळा नागरिकांच्या लक्षात आले असूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, हे विशेष.

या इमारतीच्या आधी वापरात असलेल्या जुन्या विश्रामगृहातील वीजबिल थकविल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परिणामी ती इमारत गेल्या अनेक महिन्यांपासून बंदच आहे. मात्र नव्या इमारतीमध्ये देखील अशाच प्रकारे वीजेचा गैरवापर सुरू राहिल्यास लवकरच हीच स्थिती पुन्हा ओढवू शकते.

विश्रामगृहाचा वापर स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून होतो. तरीही विजेच्या अपव्ययावर कुठलाही अंकुश लावला जात नाही. हे दुर्लक्ष नागरिकांच्या पैशाचा अपमान असल्याचे मत सोशल मीडियावर व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, शुक्रवारी शहरातील विविध भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित झाला. विशेषतः न्यायालयामागील परिसरात फ्यूज गेल्यामुळे दुपारभर वीज नव्हती. वाऱ्याचा वेग वाढल्यावर वीज तत्काळ खंडित केली जात होती, अशी माहिती नागरिकांनी दिली.

शहरात विजेच्या कमतरतेचा अनुभव सर्वसामान्यांना सहन करावा लागत असताना शासकीय इमारतीत होणारी वीज उधळपट्टी निश्चितच संतापजनक आहे. प्रशासनाने या बाबतीत तात्काळ लक्ष घालून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या