![]() |
शेतीच्या वादातून तरुणाची आत्महत्या; काकांच्या छळाचा आरोप. |
मृत चरणसिंग जाधव याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, जामदा शिवारात असलेल्या शेतीच्या वाटणीवरून त्यांचे दोन काका व त्यांच्या मुलांशी गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होते. न्यायालयाच्या आदेशानुसार शेतीच्या सातबारा उताऱ्यावर काकांची नावे लागल्यानंतर, त्यांनी चरणसिंगला शेतात येण्यास थेट मनाई केली होती. याशिवाय, त्याच्यावर वेळोवेळी मानसिक दबाव आणून धमकावण्यात येत होते.
चरणसिंगने 3 जून रोजी रात्री 8 वाजता आपले भाऊ चेतन जाधव यांना फोन करून हा त्रास सहन होत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर रात्री 10 वाजता त्याने एक भावनिक चिठ्ठी लिहून व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवली. या चिठ्ठीत स्पष्टपणे नमूद केलं की, काका व त्यांची मुलं सातत्याने त्रास देत असल्यामुळे तो जीवनयात्रा संपवत आहे.
हा मेसेज मिळताच चेतन जाधव घाबरले आणि काही मित्रांसह शिदवाडीतील शेतात पोहोचले. तिथे झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत चरणसिंग आढळून आला. लगेचच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता, त्याच्या खिशात आणखी एक हस्तलिखित चिठ्ठी मिळाली.
या आत्महत्येप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात वजेसिंग जाधव, शांताराम जाधव व प्रतापसिंग जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि कलम 306 अन्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेने संपूर्ण शिदवाडी गाव हादरलं असून, शेतीच्या मालकीसाठी होणारे वाद कुठल्या टोकाला जाऊ शकतात, याचे हे गंभीर उदाहरण ठरत आहे. नातेसंबंध, भावनिक तणाव आणि संपत्तीचे राजकारण यामुळे एका तरुणाचा जीव गेला आहे.
![]() |
👥 जळगाव न्यूज WhatsApp 📲 ग्रुपमध्ये सामील व्हा |
0 टिप्पण्या